"वाढे भाऊ" परंपरा रद्द, वंजारी समाजाचा ऐतिहासिक निर्णय


  पाथर्डी:- तरुण होऊनही लग्न जमत नसल्याने तरुण पिढी निराशेच्या गर्तेत ढकलत चालली असून या साठी समाजातील प्रत्येक घटकाने  बेटी पढाव बेटी बचाव ही संकल्पना राबवत आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे अशी अपेक्षा विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी व्यक्त केली.विठोबाराजे मंगल कार्यालयात क्षत्रिय वंजारी एकता परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर सूचक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी वंजारी समाजात असलेल्या वाढी भाऊ या प्रथेला मूठमाती देण्याचा महत्वपूर्ण ठराव मांडून तो मंजूर करण्यात आल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. 

  या वेळी राष्ट्रवादीचे नेते अँड प्रताप ढाकणे,अर्जुन शिरसाट,
आजिनाथ महाराज आंधळे,संभाजी पालवे,भगवान दराडे,भगवान आव्हाड,माणिक खेडकर,गोकुळ दौंड, गहिनीनाथ शिरसाट,डॉ. मृत्युंजय गर्जे,देविदास खेडकर,अशोक गर्जे,अमोल गर्जे,राजेंद्र दौंड, दाद मुंडे,विष्णुपंत ढाकणे,नारायण पालवे,सुभाष केकाण,वैभव आंधळे,धनंजय बडे,बजरंग घोडके, दिनकर पालवे,अरुण खाडे,राहुल कारखेले,सतीश पालवे,वसंत खेडकर,महेंद्र शिरसाट यांच्यासह वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मेळाव्यास तेलंगणा राज्यातील शिवाजी मुंडे यांनी हजेरी लावली. 

  या वेळी बोलताना खेडकर म्हणाले कि आपला तालुका हा ऊसतोड मजुरांचा तालुका असून शेतीसाठी शाश्वत पाणी नसल्याने उसतोडण्यासाठी आपल्याला जावे लागते. ऊसतोड मजुरांच्या मागचे हे ग्रहण कायमस्वरूपी मिटण्यासाठी गोदावरी खोऱ्याचे वाढीव  पाणी आपल्याला मिळण्यासाठी सर्वानीच एकदिलाने काम करायला हवे.मी सुद्धा ऊसतोड मजुरांचा मुलगा असल्याने मला मजुरांच्या कष्टाची जाण असून येथून पुढील काळात आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून काम करणार आहोत.पुढील महिन्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांचा मेळावा घेऊन या मेळाव्यात अनेक कंपन्यांना मी बोलावणार असून त्या मुळे तरुणाच्या हाताला काम मिळणार आहे.शेतीवर आधारित दोन प्रकल्प मी लवकरच सुरु करणार असून या प्रकल्पाचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. व्यावसायिक कार्यशाळा घेत तरुणांना उद्योग सुरु करून देण्याचाही आपला प्रयत्न आहे. समाजात अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी समाजातील उच्चपदस्थ अधिकारी,राजकीय नेते यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा शेवटी खेडकर यांनी व्यक्त केली. प्रथमच वंजारी समाजाचा मोठ्या स्वरूपाचा असा वधु वर सूचक परिचय मेळावा आयोजकाकडून पार पडला गेला.

 वंजारी समाजात असलेल्या वाढी भाऊ  प्रथेमुळे अनेक कुटुंबाला मुलगा किंवा मुलगी पसंद असूनही नातेसंबंध होत नसल्याने या समाजात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आजच्या मेळाव्यात वाढी भाऊ  प्रथेला मूठमाती देण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आल्याने वंजारी समाज बांधवांकडून या निर्णयाचे मोठे स्वागत करण्यात आले.  
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  पाथर्डी वंजारी समाजातील विवाहास अडसर ठरलेल्या वाढे भाऊ पद्धत हटवण्याचा ठराव प्रदूषण विभागाचे आयुक्त तथा परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप खेडकर यांनी मांडला .त्यावेळी वधू वर परिचय मेळाव्यासाठी राज्यभरातुन आलेल्या सर्व समाज बांधवांनी हात वर करून तो ठराव संमत केला. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 पाथर्डी येथे झालेल्या वंजारी समाज वधु वर मेळाव्यात बोलताना दिलीप खेडकर समवेत व्यासपीठावर प्रताप ढाकणे, अर्जुन शिरसाट, संभाजी पालवे, भगवान दराडे आदी.

Post a Comment

Previous Post Next Post