महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हळगाव (म.फु.कृ.वि.राहुरी)च्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व किटकशास्त्र विभाग अंतर्गत अरणगाव येथे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले .यासाठी विद्यार्थांना कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सखेचंद अनारसे, केंद्र प्रभारी डॉ. दत्तात्रय सोनवणे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ . मनोज गुड, कार्यक्रम अधिकारी व विषयतज्ञ डॉ. नजीर तांबोळी आदींनी मार्गदर्शन केले .
विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या पिक नियोजनाचा सर्वसाधारण सर्वे केला असता असे आढळले की शेतकरी बीजप्रक्रियेस कमी प्राधान्य देत आहेत.
कोणत्याही पिकाच्या उत्तम वाढीसाठी बीजप्रकिया ही गरजेची असते. बीजप्रक्रिया केल्या शिवाय पेरणी केल्यास विविध प्रकारच्या जैविक व अजैविक घटकांचा जमीनीतल्या बियाण्यावर वाईट प्रभाव पडतो परिणामी बियाण्याची उगवण क्षमता कमी होते व उत्पादनात घट होते . हे टाळण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे असे प्रतिपादन करत कृषीदुत - यश अहिरे,साईकिरण अटपलवार,अमेय बागले , ऋत्विक बानकर, सुशांत बिराजदार ,विवेक चांदेवार आणि किरण चव्हाण यांनी गावातील शेतकऱ्यांना कीटकनाशक वापरून बीजप्रक्रिया करून दाखवली . यात विद्यार्थ्यांनी थायमिथॉक्झॅम 30% fs हे रसायन वापरत उडीद पिकावर बीजप्रक्रिया केली. तसेच त्यांनी बुरशीनाशक , व जैविक खते वापरून बीजप्रक्रिया कशी करावी याबाबत माहिती दिली आणि लवकरच याचेही प्रात्यक्षिकही घेवू असे सांगितले या प्रात्यक्षिका साठी शेतकऱ्यांनाही मदत केली.गावातील सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.