जामखेड प्रतिनिधी
जामखेड मधील कोल्हे वस्ती येथील प्रगतशील शेतकरी तथा विठ्ठल भजनी मंडळातील एक निष्ठावंत भजनी ह. भ. प. भाऊसाहेब माणिकराव कोल्हे यांचे आज सकाळी निधन झाले.
भाऊसाहेब कोल्हे हे आषाढी व कार्तिकी दिंडी सोहळ्यामध्ये दरवर्षी सहभागी व्हायचे. मोठ्या निष्ठेने व भक्तीभावाने विठ्ठलाची सेवा करायचे. रोजचा दिनक्रम काकडा भजन पासून सुरु व्हायचा. नित्यनियमाने देवपूजा हरिपाठ घेतला जायचा. जामखेड मधील विठ्ठल मंदिरातील कीर्तन भजन सारख्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात कित्येक दशकापासून ते सेवा करायचे.
श्री कोल्हे यांचे शिक्षण फारसे नव्हते परंतु वाचन व श्रवणामुळे त्यांचे पाठांतर भरपूर होते. एखाद्या अभ्यासू कीर्तनकाराच्या कीर्तनात ते अचूक प्रमाणे देत व कुठे कोणी अडकले तर अभंगातील त्या पुढचे चरण ते अगदी पटकन सांगायचे. ते अतिषय शांत स्वभावाचे होते. साधेपणा परंतु नियमांचे काटेकोर पालन करणारे साधक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने वारकरी संप्रदायात पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.
आज दुपारी कोल्हे माळा येथील त्यांच्या शेतात भाऊसाहेब कोल्हे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी वारकरी संप्रदायातील भजनी मंडळे, महाराज मंडळी व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात बोलताना म्हणाले की निष्ठावंत वारकरी व किर्तनाला हजारो प्रमाण देणारा एक उत्कृष्ट भजनी यांची ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत यासह सर्व संतांचे आभंग मुखवतगत आसणारा विठ्ठलाचा पाईक निघुन गेल्याने आध्यात्मिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.