जामखेड शहरात विजेचा लपंडाव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
   जामखेड शहरांमध्ये सध्या विजेचा सारखा लपंडाव चालू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

   सध्या तापमान प्रचंड वाढलेले असून त्यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. घरात बसणाऱ्या व्यक्तीला फॅन किंवा कुलर शिवाय पर्याय नाही. अशातच विजेचा प्रवाह सध्या सुरळीत नसल्यामुळे जामखेडकर पुरते वैतागले आहेत. शक्यतो रात्री बऱ्याच वेळा विजेचा प्रवाह खंडित होत आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा दोन दोन मिनिटाला लाईट येते आणि जाते. कधी कधी चकमक सारखे चालू असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स साधनांचे नुकसान होण्याची भीती आहे. विजेचा दाबही बर्‍याच वेळा कमी अधिक झाल्याचाही जाणवत आहे. त्यामुळे इन्व्हर्टर, कॉम्प्युटर, लॅपटॉप, एलईडी टीव्ही अशा वस्तूंना यापासून धोका संभवतो. रात्रीच्या वेळेला वीज खंडित केल्यामुळे रस्त्यावरचे पथदिवे बंद राहतात. अशा वेळेला शहरात चोऱ्या होण्याचाही संभव असतो. त्यामुळे महावितरणने त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post