आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्या यश; आज सुटणार कुकडीचे आवर्तन


१५ डिसेंबर रोजी सुटणारे आवर्तन ५ डिसेंबर रोजीच सुटणार
 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : कर्जत-जामखेड तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी धरणाचे आवर्तन उद्या दि. ५ डिसेंबर रोजी सोडले जाणार आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन १५ डिसेंबर रोजी सुटणारे आवर्तन १० दिवस अगोदरच सुटणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. परंतु, उद्या सुटणाऱ्या आवर्तनाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

आमदार रोहित पवार दि. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित होते. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन लवकरात लवकर आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस न झाल्यास कुकडीचे १५ डिसेंबर रोजी सुटणारे आवर्तन १५ ते २० दिवस अगोदरच सोडावे अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. परंतु, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले.
 

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ कालवा सल्लागार समितीची अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहून कुकडी प्रकल्पाचे रब्बी हंगामातील आवर्तन २५ नोव्हेंबर रोजी सोडावे अशी विनंती केली. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून आपण मा. पालकमंत्री तथा अध्यक्ष कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांना आपल्या स्तरावरुन मागणी करावी अशी विनंती केली. त्या अनुषंगाने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता १० दिवस अगोदरच कुकडीचे आवर्तन सोडले जाणार आहे. यामुळे कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ५४ गावातील शेतकऱ्यांची आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post